ताज़ा खबरे
Home / मनोरंजन / इत्तफाकः ‘योगायोगा’चा जमलेला थरार सिनेरिव्ह्यू

इत्तफाकः ‘योगायोगा’चा जमलेला थरार सिनेरिव्ह्यू

सस्पेन्स थ्रिलर दोन प्रकारचे असतात. एखाद्या रहस्याची उकल करण्यासाठी ढीगभर पात्रं समोर असतात, संशयाची सुई सतत एकाकडून दुसऱ्याकडे फिरत असते आणि सरतेशेवटी एकदम ध्यानीमनी नसलेली व्यक्तीच गुन्हेगार म्हणून पुढे येते. तर, दुसऱ्या प्रकारच्या ‘सस्पेन्स थ्रिलर’मध्ये मोजक्याच व्यक्तिरेखा असतात. घडलेल्या घटनेची प्रत्येकाची आपापली ‘व्हर्जन’ असतात. मात्र, सत्य एकच असते. रहस्य उलगडण्याच्या प्रवासात दोन-तीन जणांवर संशय येतोही. मात्र, संबंधित गुन्हेगार कोण यापेक्षा त्याने केलेल्या गुन्ह्याची उकल कशी होते यावर सारं काही अवलंबून असतं. दिग्दर्शक अभय चोप्राचा (बी. आर. चोप्रांची तिसरी पिढी) नवा इत्तफाक दुसऱ्या प्रकारातील आहे. यश चोप्रांच्या गाजलेल्या ‘इत्तफाक’पासून प्रेरणा घेऊन हा सिनेमा केला आहे, यातच सारं काही आलं. अर्थात दोन्ही ‘इत्तफाक’ची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे, संदर्भ वेगळे आहेत आणि मांडणीही वेगळी आहे. नवा ‘इत्तफाक’ उत्कंठावर्धक आहेच. मात्र, शेवटाकडं जात असताना तो काहीसा फसला आहे. किंबहुना अशा ‘थ्रिलर’ला अपेक्षित असलेला शेवट इथे नाही. तरीही एक चांगला सस्पेन्स थ्रिलर पाहू इच्छिणाऱ्यांनी नव्या ‘इत्तफाक’च्या वाट्याला जायला हरकत नाही.

विक्रम सेठी (सिद्धार्थ मल्होत्रा) हा एक प्रतिथयश एनआयआर लेखक आहे. आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी तो पत्नीसह मुंबईला आला आहे. मुंबईत आल्यावर त्याच्या पत्नीचा खून होतो. खून झाल्याचे खुद्द विक्रमच पोलिसांना कळवतो. पोलिस संशयित म्हणून त्याला ताब्यात घेतात. मात्र, त्या वेळी तो पोलिसांच्या तावडीतून पळ काढतो. आश्रयाला तो मायाच्या (सोनाक्षी सिन्हा) घरी जातो. त्याच रात्री मायाच्या घरी तिच्या नवऱ्याचाही खून होतो. ‘डबल मर्डर’चा ठपका ठेवून पोलिस विक्रमला ताब्यात घेतात. या खुनाचा उलगडा करण्याची जबाबदारी देव (अक्षय खन्ना) या पोलिस अधिकाऱ्यावर येते. विक्रम आणि माया एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करू लागतात. दोन्ही खून झालेल्या रात्री नक्की काय झालं, माया खरे बोलते आहे का विक्रम खरे बोलतो आहे, सत्य काय आहे याचा शोध घेण्याची जबाबदारी देववर येते. या दोघांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्ती, विक्रम, माया यांचे खासगी आयुष्य काय आहे याचा उलगडा करीत देव सत्यापर्यंत पोहोचतो. हा सत्यापर्यंतचा प्रवास म्हणजे ‘इत्तफाक’! रहस्य हाच सिनेमाचा आत्मा आहे. त्यामुळे त्याबद्दल बोलायला नकोच.

अशा प्रकारच्या सिनेमांसाठी आवश्यक असते ती मांडणी. घडलेल्या गोष्टी एकसलग न दाखवता त्याचे तुकडे-तुकडे दाखवले जातात. त्यातही सलग एकाचे ‘व्हर्जन’ दाखवले जात नाही. दोघांच्या बाजूंची सरमिसळ होते. त्यामुळे ही मांडणी गुंतागुंतीची होते. अर्थात तरीही ती तार्किकदृष्ट्या बरोबरच असते आणि ही गुंतागुंत प्रेक्षकाला खिळवून ठेवते. प्रत्येक महत्त्वाच्या व्यक्तिरेखा आणि त्यांचे म्हणणे ‘कट टू कट’ संकलनातून प्रभावीपणे मांडले जाते. या झाल्या सिनेमाच्या जमेच्या बाजू. दुहेरी खुनांची ही कथा उलगडताना वेगवेगळे संदर्भ तपासणे, पुरावे गोळा करणे आदी गोष्टी चोखपणे पार पाडल्या जातात. सत्यापर्यंत पोहोचण्याचा देव उत्तम प्रयत्न करतोही. मात्र, त्याने शोधलेले सत्य आणि प्रत्यक्ष सत्य यात असलेला फरक दाखवताना त्यातील उत्कंठा आणखी ताणायला हवी होती. किंबहुना तो इतका साध्या आणि सोप्या पद्धतीने पुढे आल्याने संपूर्ण सिनेमाचा प्रभाव कमी होतो. शेवटपर्यंत ताणलेली गोष्ट अगदी शेवटच्या काही क्षणात ‘अब्बास मस्तान’ स्टाइल होऊन जाते. अर्थाच चित्रपटाची रचना व्यावसायिक चौकटीतील सिनेमाची असल्याने या आकृतिबंधाच्या सिनेमात जे होतं, तेच इथही होतं.

संपूर्ण सिनेमात लक्षात राहतो तो अक्षय खन्नाने रंगवलेला पोलिस अधिकारी. अभिनयात परिपक्व झालेला अक्षय खन्ना आणि त्याचा परफॉर्मन्स पाहणं हा एक भन्नाट अनुभव आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि सोनाक्षी सिन्हा आपापल्या भूमिका उत्तमपणे पार पाडतात. नितीन बैद याच्या संकलनाने चित्रपटाचा टेम्पो कोठेही कमी होत नाही. क्लायमॅक्सला गुन्हेगाराला पकडण्यासाठी चाललेला देव ट्रॅफिकमध्ये अडकतो आणि त्याच वेळी नेमका गुन्हेगाराचा त्याला फोन येतो. सिनेमा मूळ गोष्टीसाठी मागे जातो आणि इकडे देवही गाडी ‘रिव्हर्स’ घेतो. हा दृश्यात्मक परिणाम चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेतो. तनिश्क बागचीचे संगीतही रहस्यपटाचा थरार आणखी गहिरं बनवतं. सिनेमा कागदावर सशक्त आहे. कन्टिन्युटीतही तो कोठे मागे-पुढे होत नाही. अनेक वेळा अशा प्रकारच्या सिनेमात काही प्रश्नांची उत्तरे वाऱ्यावर सोडली जातात. इथे तसे नाही. फक्त शेवटी गुन्हेगाराचा ताबा घेण्यासाठी केलेले प्रयत्न हास्यास्पद वाटतात. शेवटची गडबड टाळली असती तर सिनेमा आणखी प्रभावी झाला असता.

Check Also

अभिनेता सुशांत सिंह राजपुत फांसी लगाकर आत्महत्या की

मुंबई- बॉलीवुड से एक बहुत ही चौंकाने वाली खबर सामने आई है। मशहूर एक्टर सुशांत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *