प्रेम ही भावना अलगदपणे उलगडणारी असते. काही वेळा तिची जाणीव एखाद्या धडाक्याने होत असली, तरी उलगडणे हळूवारच असते. त्यामुळे अशी एखादी प्रेमकथा मांडताना तिचा उलगडा हलक्या हाताने व्हायला हवा. तसे न झाल्यास, गोष्ट फसते. ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शक अश्विनी अय्यर-तिवारी यांना ही नीरगाठ उकलणे जमले आहे. अगदी साधी गोष्ट आणि तितकीच साधी, सोपी मांडणी हे या चित्रपटाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य.
ही गोष्ट आहे बिट्टी मिश्रा (कृती सेनॉन) नावाच्या बरेलीमध्ये राहणाऱ्या मुलीची. आई-वडिलांची (सीमा भार्गव, पंकज त्रिपाठी) लाडकी आणि आपल्याला हवे तसे जगणारी. तिचा हाच मोकळेपणा लग्नाच्या ठरलेल्या चौकटीला मानवणारा नसतो. त्यामुळे मुलांकडून नकार आणि दोनदा तर ठरलेलं लग्न मोडलेलं. असेच एकदा बोलणी फिसकटल्यावर ती घरातून निघून जाण्याचे ठरवते. रेल्वे स्थानकावर ‘बरेली की बर्फी’ हे पुस्तक विकत घेते. त्या रात्रीत ती ते पुस्तक वाचून पूर्ण करते आणि घरी परतते. हे पुस्तक तिला भुरळ घालते; कारण त्यामध्ये तिला तिचीच कहाणी दिसते. मग सुरू होतो पुस्तकाचा लेखक प्रीतम विद्रोही (राजकुमार राव) याचा शोध. सुरुवात होते पुस्तक विक्रेत्यापासून. तो पुस्तक छापणाऱ्या चिराग दुबे (आयुषमान खुराना) याच्यापर्यंत पोहोचवतो. मग तेथून सुरू होते बिट्टी आणि चिरागची मैत्री. यामध्ये चक्क पत्रव्यवहार आहे.
प्रीतम आणि बिट्टी यांच्यातला तो दुवा होऊ पाहतो. यामध्ये एक गंमत आहे. ‘बरेली की बर्फी’ या पुस्तकाचा खरा लेखक चिराग असतो आणि काही कारणामुळे त्यांनी ते प्रीतमच्या नावाने प्रसिद्ध केलेले असते. पुढे चिरागच बिट्टू आणि प्रीतमची भेट घडवून देतो आणि कथा आणखी एक वळण घेते.
हे वळण काय असेल, याचा अंदाज हे वाचता वाचताच आला असेल; कारण कथा खरेच सरळ, साधी आहे. महत्त्वाची आहे त्या कथेची मांडणी आणि येथे हा चित्रपट बाजी मारतो. उन्हाळ्याच्या रात्री गच्चीवर गाद्या घालून झोपल्यानंतर कोणीतरी छान गोष्ट सांगायला सुरुवात करतो. आपण त्या गोष्टीत गुंतून जातो, कधीकधी त्यातले एखादे पात्रही होतो. कथेची मांडणी तशीच आहे; त्यामुळे ती भावते. चित्रपटाचे छायाचित्रण, वापरलेली रंगसंगती आणि फ्रेम यांचाही उल्लेख करायला हवा. दिग्दर्शिकेने चित्रचौकटींची मांडणी विचारपूर्वक केली आहे. कृती सेनॉन छानच. तिने तिच्या विचारांतला मोकळेपणा देहबोलीतून चांगल्या प्रकारे साकारला आहे. तिची वेशभूषा तिला अधिक उंच दाखवणारी. आयुषमान खुरानाही चांगला. राजकुमार राव याने चांगली फटकेबाजी केली आहे. त्याचा मूळ स्वभाव आणि या नाटकामध्ये त्याला करावी लागणारी विरुद्ध स्वभावाची भूमिका तो चांगल्या प्रकारे दाखवतो. मजा आणतो. आई, वडील आणि मुलगी हा त्रिकोणही छान जमून आला आहे. एकमेकांवर प्रेम करणारे आणि काळजी वाटणारे हे तिघे कुटुंब म्हणून छान वाटतात.
एकंदरीतच ही सहज वाटणारी गोष्ट छान रंगली आहे. सहजता, साधेपणा हे पाहताना सोपे वाटले, तरी मांडणीत ते खूप अवघड असते. बरेच मोह टाळावे लागतात; पण साधेपणात सौंदर्य आहे, हे त्यानंतरच समजते. प्रत्येक कथेचे, तिच्या मांडणीचे वैशिष्ट्य असते. काही कथांमध्ये वळणे असतात, कोन असतात, टोक असते; त्यामुळे ती मांडणी तशी होते. या चित्रपटाचे नावच ‘बरेली की बर्फी’ आहे आणि बर्फी तयार करण्यासाठी घाई उपयोगाची नसते. मंद आचेवर केल्यास ती जमते, घाई केल्यास बिघडते. ही बर्फी मात्र जमून आलेली आहे.
………………..
दिग्दर्शक: अश्विनी अय्यर तिवारी
कथा, पटकथा: नितेश तिवारी, श्रेयस जैन, रजत नोनिया
कलाकार: कृती सेनॉन, आयुषमान खुराना, राजकुमार राव