पिंपरी: खिंवसरा पाटील शिक्षण संकुलातील ‘ प्राथमिक विद्यामंदिर’ या शाळेने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मिळवलेला ” आदर्श शाळा पुरस्कार” हा अत्यंत प्रतिकुल परिस्थिती मिळवलेला पुरस्कार आहे. शाळेच्या भौतिक कमतरतेवर मात करत शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी मेहनतीने मिळवलेला हा पुरस्कार आहे, असे मत आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केले.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुलातील ‘ प्राथमिक विद्यामंदिर’ गणेशनगर थेरगाव यांना ” आदर्श शाळा पुरस्कार” व लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालय गणेशनगर थेरगाव विभागातील सहशिक्षक सुनीता घोडे यांना पिंपरी- चिंचवड महापालिकेतर्फे नुकताच गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाला. या पुरस्काराबद्दल थेरगाव येथील खिंवसरा पाटील शिक्षण संकुलात बुधवारी (दि.22) कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून आमदार लक्ष्मण जगताप बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्राचे सहसंपर्क प्रमुख संदीप जाधव, पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. राजेश पुणेकर, नगरसेविका झामाबाई बारणे, नगरसेवक नामदेव ढाके, संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाहक अॅड. सतीश गोरडे, उपाध्यक्ष हरी भारती, व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगळे, नितीन बारणे, सुनिता शिंदे, गतिराम भोईर, आसारम कसबे शाळेचे माजी विद्यार्थी निलेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. कार्यक्रमात अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आदर्श शाळेचा पुरस्कार मिळवल्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक नटराज जगताप व सर्व शिक्षक वर्गाचा स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना लक्ष्मण जगताप म्हणाले की, सत्कारामुळे प्रतिष्ठा मिळते तशी जबाबदारीही वाढते. शाळेचा नावलौकीक अजून वाढावा यासाठी भविष्यातही प्रयत्न होणे गरजेचे आहेत. प्रतिकुल परिस्थितीमध्ये शाळा यश मिळवू शकते तर पुढे सुधारणा झाल्यानंतर शाळेचा आणखी नावलौकीक वाढेल. यासाठी भविष्यातील शाळेच्या भौतिक सुविधांसाठी मी स्वतः प्रयत्न करेन. गाव, शहर, देश सुधारायचा असेल तर मुळात शिक्षण संस्था व शिक्षण पद्धती चांगली असली पाहिजे. कारण ती भविष्यातील पिढी घडवत असते. अन्यथा बिघडलेली शिक्षण पद्धती अणुबॉम्ब पेक्षाही घातक असते, असे मत जगताप यांनी व्यक्त केले.
गिरीश प्रभुणे यांनी शाळेच्या शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शाळेच्या यशात शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांचाही मोठा वाटा असल्याचे मत प्रभुणे यांनी व्यक्त केले. संस्थेचे कार्यवाहक अॅड. सतीश गोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेने हे यश मिळवले आहे. आपले मत यावेळी व्यक्त करताना गोरडे यांनी मुख्याध्यापक नटराज जगातप यांचे कौतुक केले व भविष्यात शाळेची अधिक प्रगती व्हावी यासाठी त्यांची व शाळेची जहाहदारी कशी वाढली आहे याची जाणीव त्यांनी त्यांच्या मनोगतातून करुन दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजंली सुमंत, प्रास्ताविक अश्विनी बाविसकर व आभार सूर्यकांत आरेकर यांनी मानले.