दशक्रिया चित्रपटात हिंदू धर्म, ब्राह्मण समाज यांवर टीका दाखवण्यात आली आहे. पुरोहित समाज आपणहून विधी करायला बोलावत नाही. अशा प्रकारे खोटा प्रसार करून हिंदू धर्माची विटंबना करणे गैरच आहे. अशा पद्धतीने हिंदू धर्मातील परंपरा आणि हिंदूंच्या आस्थांविषयी विकृत दृश्ये दाखवणा-या चित्रपटांना रोखा, अशी एकमुखी मागणी वारकरी महाअधिवेशनात वारक-यांनी केली.
हिंदू जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदाय यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त १५ नोव्हेंबरला देविदास धर्मशाळा तथा मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर येथे 13 वे वारकरी महाअधिवेशन पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वामी अमृताश्रम महराज होते. या अधिवेशनाला ह.भ.प. निवृत्ती महराज वक्ते, ह.भ.प. प्रकाश महारज जवंजाळ, ह.भ.प.रामेश्वर शास्त्री महराज, ह.भ.प. बाबुराव महाराज वाघ, ह.भ.प. कोकरे महराज, ह.भ.प. पेनोरे महाराज, ह.भ.प. निरंजनशास्त्री कोठकर महाराज, ह.भ.प.श्याम महाराज राठोड, ह.भ.प. चोले महाराज, ह.भ.प. नारायण महाराज शिंदे, ह.भ.प. मारुती तुणतुणे महाराज यांसह ४०० पेक्षा अधिक वारकरी उपस्थित होते.
‘गोवंश हत्याबंदी कायदा महाराष्ट्रात झाला खरा, पण त्याची कठोर अंमलबजावणी राज्यभरात व्हायला हवी, असे मत ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ यांनी व्यक्त केले. तसेच ‘सनबर्न फेस्टिव्हल’ समाजासाठी आणि धर्मासाठी किती घातक आहे याची कल्पनाच जनतेला नाही. प्रारंभी गोव्यात होणा-या या कार्यक्रमात अमली पदार्थांची विक्री यांसह अनेक अनैतिक गोष्टी घडत होत्या. त्याठिकाणी पोलिसांनी धाड टाकल्यावर अडीच कोटी रुपयांचे मादक पदार्थांसह ते विकणारा व्यापारीही पकडला गेला. त्यानंतर गोवा शासनाने या कार्यक्रमाला गोव्यातून हाकलून दिले. असे असताना पाश्चात्य संगीताचा कार्यक्रम म्हणून आणि महाराष्ट्र शासनाला महसूल मिळेल यासाठी हा कार्यक्रम शासनाने पुण्यात आणला, परंतु पुण्यातच अन्य ठिकाणी कार्यक्रम व्हावा यासाठी शासन क्रियाशील आहे. हिंदू धर्म, भारतीय संस्कृती नष्ट करणारा असा कार्यक्रम महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाणा-या पुण्यातच नव्हे तर भारतात कुठेच होऊ नये अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.