मुंबई। महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) च्या जागेतील पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याबाबत नोटीसा देण्यात आल्या आहेत. धार्मिक स्थळे वाचविण्याबाबत मोहननगर परिसरातील नागरिकांनी उद्योगमंत्री देसाई यांची भेट घेऊन साकडे घातले. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत, अवमान न करता त्यातून मार्ग काढण्यात येईल. एमआयडीसीच्या जागेवरील अनधिकृत धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे, आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बुधवारी (दि.15) मुंबईतील विधानभवनात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन मंदिरे वाचविण्याचे साकडे घातले. नगरसेवक प्रमोद कुटे, मंदिर बचाव समितीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, मधुकर बाबर, योगेश बाबर, गणेश लंगोटे यांच्यासह मोहननगर परिसरातील परिसरातील आदी नागरिक शिष्टमंडळामध्ये होते.
एमआयडीसीच्या जागेत 43 अनधिकृत धार्मिक स्थळे आहेत. झोपडपट्यांमध्ये आठ, मोकळ्या जागेत 11 आणि इतर भागात आणि रस्त्यांवर अशी 43 मंदिरे आहेत. धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याच्या नोटीसा एमआयडीसीने मंदिर व्यस्थापनाला दिल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावू शकतात. त्यासाठी मोहननगर परिसरातील नागरिकांनी त्याविरोधात लढा उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मंदिर बचाव समितीची स्थापना केली आहे. समितीच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांची निवड करण्यात आली आहे.
मंदिरे वाचविण्यासाठी खासदार बारणे यांच्या नेतृत्वाखाली मंदिर बचाव समितीच्या शिष्टमंडळाने बुधवारी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. न्यायालयाचा निर्णयाचा आदर राखत, अवमान न करता त्यातून मार्ग काढण्यात येईल. औरंगाबदमधील सिडकोने 2009 पूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळे अधिकृत केली आहेत. सिडकोच्या धर्तीवर एमआयडीसीच्या हद्दीतील शहरातील धार्मिक स्थळे अधिकृत करण्यात येतील, असे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले असल्याचे, खासदार बारणे यांनी सांगितले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, “धार्मिक स्थळांवर कारवाई करू नये तो नागरिकांचा भावनिक मुद्दा असतो. नागरिकांच्या भावनेचा आदर करणे गरजेचे आहे. एमआडीसीच्या हद्दीतील धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई साहेब सकारात्मक आहेत.”