पुणे। (PNE)- कार्तिकी यात्रेत ९ ते १८ या काळात संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा होत आहे. यातील नियोजनात भाविक-नागरिकांना विविध सेवा सुविधा देण्याचे कामात प्रभावी सुसंवादास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.
आळंदी नगरपरिषदेच्या कामगार, विविध विभाग प्रमुख यांचेशी सुसंवाद साधून येथील कार्तिकी यात्रेचे प्रभावी नियोजन करण्यासाठी त्यांनी बैठक घेतली. या बैठकीत यात्रा काळासह नियमित नागरी सेवा सुविधा देण्यासाठी प्रशासनास मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
आळंदीत आल्यानंतर नागरिकांसह, भाविकांना पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा, वीज पुरवठा, स्वच्छता, सुरक्षा आदी सेवा सुविधाबाबत कामगार, विभाग प्रमुखांशी संवाद साधला आहे. यापुढील काळात पदाधिकारी, नागरिक आणि विविध संस्था प्रमुखांशी सुसंवाद साधून कार्तिकी यात्रेचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यात्रा काळात आरोग्य, पाणी पुरवठा तसेच स्वच्छता यास प्राधान्य देण्यात येणार आहे. नागरिक व भाविकांनी देखील नगरपरिषदेस सहकार्य करून नियोजनाच्या कामकाजात भाग घ्यावा. राज्य परिसरातून आलेल्या भाविकांची तसेच नागरिकांची यात्रा काळात गैरसोय होणार नाही. याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.