चेन्नई।(PNE) –तामिळनाडूत चेन्नईसह किनारपट्टीवरील जिल्ह्यांत सलग पाचव्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. चेन्नईत चोवीस तासांत २०२ मिमी पावसाची नोंद झाली. १ डिसेंबर २०१५ नंतरच्या पुरानंतरचा हा एका दिवसातील पावसाचा नवा विक्रम आहे. कांचीपुरममध्ये सर्वाधिक ६२७ मिमी पाऊस झाला. राज्यात शुक्रवारी १९३ मिमी पाऊस झाला. किनारपट्टीवरील अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.
शाळा-महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. परीक्षादेखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सरकारने चेन्नईतील १२ हजार माहिती-तंत्रज्ञान कंपन्या व इतर कंपन्यांना सुटीचे आदेश दिले. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार ६०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे काम ठप्प झाले आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत पाऊस राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
राज्यात पुराचा परिणाम
– तारांगामवाडी व सिरकाजी तालुक्यांत १ हजारावर घरे पाण्यात बुडाली.
– नागापट्टिणममध्ये शेकडो घरांना पाण्याचा वेढा, पिकांचेही नुकसान.
– किनारपट्टीवरील सुमारे ७० टक्के प्रदेश अंधारात बुडाला आहे.
– सर्वात जास्त परिणाम दक्षिण चेन्नईत दिसून आला. निम्म्या घरांत पाणी. }५० टक्के लोकांकडे पिण्याचे पाणी नाही.