पंढरपूर: कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी आज पांढरी नगरीत सहा लाख भाविक दाखल झाले असून आज पहाटे राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्नीक विठूरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली. यावेळी कर्नाटकातील विजापूर येथील बळीराम चव्हाण आणि शिनाबाई चव्हाण या दाम्पत्याला मानाच्या वारकऱ्यांचा मान मिळाला. कर्नाटक स्टेट ट्रान्सपोर्टमध्ये चालक असलेल्या चव्हाण यांनी महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, असे साकडे विठुरायाला घातले. बळीराम चव्हाण आणि सीनाबाई चव्हाण हे कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्यातील हडगली गावचे असून गेल्या ५ वर्षांपासून ते पंढरीची वारी करतात.
‘राज्यातील जनता सुखी आणि सुरक्षित राहू दे’, असं साकडं विठुरायाला घातल्याचं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. वारकऱ्यांच्या मागणीनुसार मंदिर समितीला सहअध्यक्ष पद निर्माण केले असून समितीमध्ये रिक्त असलेल्या ३ जागांवरही वारकरी प्रतिनिधी भरले जाणार असल्याचं पाटील म्हणाले. राज्यसरकारला आज ३ वर्ष पूर्ण होत असताना जी कामे ठेवली ती पूर्ण करीत असल्याचा आनंद असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. मंदिर समितीच्यावतीने महसूल मंत्र्यांचा चांदीची विठ्ठल मूर्ती देऊन तर मानाचे वारकरी चव्हाण दाम्पत्याचा प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने मानाच्या दाम्पत्याला वर्षभर मोफत प्रवासाचा पास देण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने घोषित केलेल्या टोकन दर्शन व्यवस्थेचा उदघाटन करण्यात आले.