पुणे: पुणे महापालिका परिसरात गेल्या आठ महिन्यात झाडे उन्मळून पडण्याच्या इतक्या घटना घडल्या आहेत की त्यामुळे भाजप सरकारने नव्याने आणलेला जीएसटी रेरा कायद्यामुळे झाडे आत्महत्या करत आहेत का, असा खोचक सवाल विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी मुख्यसभेत उपस्थित केला. शहरातील बेकायदा वृक्षतोडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यसभेमध्ये आंदोलन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
गेल्या पंधरा दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी झाडांची कत्तल करण्यात येत असून यासाठी वृक्ष समितीची परवानगी न घेता आयुक्तांनी आपले अधिकारात या वृक्ष तोडीची परवानगी दिली असल्याचे सांगत आयुक्त मनमानी करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यसभेमध्ये आंदोलन करण्यात आले. वृक्षाची कत्तल करणाऱ्याचा निषेध, पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याचा निषेध असे पोस्टर दाखवून जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनचा निषेध केला.
तुपे म्हणाले की मागील आठ महिन्यात वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विकासकांना अडसर होणारीच झाडे का उन्मळून पडत आहेत याची चौकशी होण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गफूर पठाण यानी हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. आयुक्त वृक्ष समितीला विचारात न घेता मनमानी करत असल्याचा आरोप त्यांनी केला
भाजप नगरसेवक योगेश मुळीक यांनी देखील वडगाव शेरी येथे 59 झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती देत चुकीच्या पद्धतीने वृक्षतोडीला परवानगी देण्यात येत आहे. झाडे उन्मळून पडली असे सांगून विकासक बेकायदा झाडे तोडत असून अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला यावेळी सर्वपक्षीय सभासदांनी वृक्षतोडी बाबत आक्षेप नोंदवला.
या बाबत खुलासा करताना आयुक्त म्हणाले की, वृक्षतोडीच्या संदर्भतील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येणार असून यामुळे अर्जाची नेमकी संख्या समोर येणार आहे. तसेच बेकायदा वृक्ष तोड करण्यावर फौजदारी कारवाई करण्याची महापालिकेची तयारी असल्याचे त्यानीं सांगितले.