मुंबई। (PNE)- राज्याच्या ऊस पट्ट्यात यंदाचा गाळप हंगाम सुरु होणार असतानाच आता एफआरपीमध्ये 200 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामासाठी उसाच्या एफआरपीमध्ये दोनशे रुपये वाढ करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस केंद्रीय कृषिमूल्य आयोगानं केंद्र सरकारकडे केलीय.
९.५ टक्के साखर उताऱ्याला २७५० रुपये, तर त्यापुढील प्रत्येक टक्क्यास साधारणत: २८० रुपये मिळणार असल्यानं एफआरपीची रक्कम ही आता 3 हजार रुपयांच्या पुढं जाणार आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च, बाजारातील साखरेचे दर व साखर कारखान्यांचा उत्पादन खर्च यांचा ताळमेळ घालून उसाची एफआरपी निश्चित करण्याचं काम केंद्रीय कृषिमूल्य आयोग करतं. साधारणत: बाजारपेठेतील साखरेच्या दराचा ठोकताळा बांधूनच हा दर ठरविला जातो. २०१५-१६ च्या हंगामामध्ये ९.५ टक्के साखर उताऱ्याला २३०० रुपये, तर त्यानंतरच्या प्रत्येक टक्क्याला २४८ रुपये एफआरपी निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर आता एफआरपीमध्ये यंदाही ही वाढ होणार असल्यानं कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
विशेष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी यंदा पहिल्या उचलीला 3400 रुपयांची मागणी केलीय.