औरंगाबाद : महापालिकेच्या नव्या महापौरांसाठी आज (ता.29) झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचे नंदकुमार घोडेले व उपमहापौरपदी भाजपचे विजय औताडे प्रत्येकी 77 मते मिळवून विजयी झाले. एमआयएमचे अब्दुल नाईकवाडी यांना 25 तर कॉंग्रेसचे उमेदवार आयुब खान यांना 11 मते मिळाली.
भाजपचे महापौर भगवान घडामोडे व शिवसेनेच्या उपमहापौर स्मिता घोगरे यांचा कार्यकाळ काल संपला होता. युतीमध्ये झालेल्या करारानूसार शेवटची अडीच वर्ष महापौरपद आता शिवसेनेकडे असणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेकडून भाजपला डावलले गेले होते त्याचा भाजप बदला घेणार, स्वतंत्र उमेदवार देणार अशी चर्चा सुरुवातीला होती. स्थानिक नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याकडे तशी इच्छा देखील व्यक्त केली होती. पण मुख्यमंत्री फडणवीस यांनी औरंगाबाद दौऱ्यात महापौर निवडणुकीच्या वेळी युती धर्म पाळा असे निर्देश भाजपच्या नेत्यांना दिले होते.
भाजपची संशयास्पद भूमिका पाहता शिवसेनेने अपक्षांच्या पाठिंब्यावर महापौर करण्याच्या हालचाली सुरु केल्या होता. अखेर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजप कोअर कमिटी व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब झाले आणि नंदकुमार घोडेले यांच्या महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला. आज झालेल्या निवडणुकीत नंदकुमार घोडेले यांना 77 मते मिळाली. शिवसेना-भाजप नगरसेवकांसह अपक्षांनी देखील त्यांच्या बाजूने मतदान केले.
दर्जेदार रस्त्यांना प्राधान्य- घोडेले
महापौरपदी विराजमान झाल्यानवर नंदकुमार घोडेले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना शहरात दर्जेदार रस्ते आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी शहर बस सेवा सुरु करण्याला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. औरंगाबाद शहर राज्याची पर्यटन राजधानी व ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिध्द आहे. त्यामुळे शहराला सुंदर, स्वच्छ, हरित आणि स्मार्ट करण्याचा संकल्प घोडेले यांनी व्यक्त केला. महापालिकेतील उपायुक्त आयुब खान यांना नुकतेच लाचखोरीच्या आरोपात अटक झाली. या पार्श्वभूमीवर लोकाभिमुख प्रशासनावर जोर देणार असल्याचे घोडेले यांनी आर्वजून सांगितले. या शिवाय स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व संग्रहालयाच्या कामाला गती देण्याचा निर्धार व्यक्त करतांना यापुढे जनतेला कळावे यासाठी विकास कामांची यादीच जाहीर करण्याची घोषणा नंदकुमार घोडेले यांनी केली.