औरंगाबाद : “ मी मागे एकदा पंकजा मुंडेला म्हणालो होतो, गेल्या जन्मीचे पाप म्हणून साखर उद्योगात आलो, कारण साखर विकणं म्हणजे आता तोट्याचा धंदा झाला आहे. देशात साखरेचे उत्पादन वाढले आणि भाव चोवीस रुपयांवर आले तर काही खरे नाही, पण नाइलाजाने मला कारखाना चालवावा लागतोय. नाही तर माझे सोळा आमदार चार खासदार पडतील’ अशी जोरदार टोलेबाजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. छत्रपती संभाजी राजे साखर उद्योगाच्या सतराव्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. “ऊसाचा भाव जाहीर करतांना हरिभाऊ सांभाळून बोला नाही तर शहिद व्हायची वेळ येईल’ असा चिमटा देखील त्यांनी काढला.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. एक वेळ अशी होती की हरिभाऊंना साखर कारखाना सोडावा लागतो की काय ? पण गोर गरीब शेतकऱ्यांवरील प्रेमापोटी त्यांनी संकटांचा सामना करत कारखाना चालवल्याचे गौरवोद्गार नितीन गडकरी यांनी काढले. साखर कारखाना म्हणेज विकासाचे इंजिन आणि सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे. पण साखरेला भाव देण्याचे आता आपल्या हातात नाही, ब्राझीलमधील भावावर देशातील साखरेचे भाव ठरतात. त्यामुळे देशभरात साखरेचे उत्पादन वाढले तर साखरेचे भाव कोसळण्याची शक्यता गडकरी यांनी वर्तवली.
दोन वर्षात सिंचन चाळीस टक्यांवर नेणार
पाण्याचा मुद्दा देशभरात महत्वाचा असल्याचे सांगून महाराष्ट्रातील सिंचन येत्या दोन वर्षात 14 वरुन 40 टक्यावर नेण्याचे आव्हान मी आणि मुख्यमंत्र्यानी स्वीकारले आहे. सिंचन योजनेसाठी पैसे देण्याचे केंद्र सरकारचे धोरण असून धरणांच्या कामांसाठी 70 ते 80 कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा गडकरी यांनी केली. धरणाचे पाणी यापुढे कॅनॉलने नाही तर पाईपद्वारे दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी देखील ड्रीपचा वापर करत आपले उत्पादन वाढवावे असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले.