अकोला : रिपब्लिकन ऐक्याची ताकद फार मोठी असुन ऐक्यासाठी आपण सुरूवातीपासूनच आग्रही आहोत. मात्र, काही नेत्यांमुळे रिपब्लिकन ऐक्याची मोट बांधण्यात अडचणी येत आहेत. अशा नेत्यांना रिपब्लिकन जनतेने जिल्हाबंदी करणे आवश्यक आहे. मी आहे ऐक्यासाठी वेडा…मी आहे ऐक्यासाठी वेडा…आणि तुम्ही म्हणता त्यांनीच घातला यामध्ये खोडा…अशी टिप्पणी करीत केंद्रीय सामाजीक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. देशात सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दलित मुलीशी लग्न करून आदर्श घडवावा, असे आवाहन आठवले यांनी केले.
गुजरातमध्ये कॉंग्रेसकडून मोठ-मोठ्या उड्या मारण्यात येत आहेत. मात्र, सर्वांत मोठी उडी नरेंद्र मोदींची राहील हे त्यांनी विसरू नये. गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता येणार आहे. राहुल गांधी हे सध्या चांगले काम करीत आहेत. ते अधून-मधुन दलितांच्या घरी जाऊन जेवतात, बसतात त्यांना आपले म्हणतात. त्यांना दलित समाजाबद्दल येवढाच आपलेपणा वाटतो, तर त्यांनी दलित मुलीशी लग्न करून देशासमोर आदर्श दाखविणे आवश्यक असल्याचे रामदास आठवले म्हणाले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शनिवार (ता.28) जिल्ह्यात आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमासाठी रामदास आठवले अकोल्यात आले होते. त्यापुर्वी येथील हॉटेल जसनागरामध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर, माजी आमदार अनिल गोंडाणे, सहसचिव अशोक नागदिवे, महानगराध्यक्ष गजानन कांबळे, ज्येष्ठ नेते त्र्यंबकदादा सिरसाट, वाशिम जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे, डी. गोपनारायण आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रामदास आठवले म्हणाले, की 1995 मध्ये रिपब्लिकन ऐक्य झाल्यावर राज्यात दलितांची ताकद दिसली होती. प्रकाश आंबेडकरांनी ऐक्यात सीताराम केसरी यांची भुमिका महत्वाची होती व शरद पवारांची भुमिका शुन्य होती हे म्हणणे चुकीचे आहे. मी दलित पॅंथर बरखास्त केली नसती तर ऐक्य झाले नसते. पण मला त्या गोष्टीचे श्रेय घ्यायचे नाही. काही नेत्यांनी ऐक्यातून बाहेर पडल्याने समाजाचे फार मोठे नुकसान झाले व आजही होत आहे. ऐक्यासाठी आपण सुरूवातीपासूनच आग्रही आहोत. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात आम्ही काम करायला तयार आहोत. पण काही नेत्यांची ऐक्य व्हावे अशी ईच्छा नसून ते नेते कोण सर्वांनाच माहित आहे. दलित समाजाने अशा नेत्यांना जिल्हाबंदी करून ऐक्याच्या झेंड्याखाली एकत्र येणे काळाची गरज आहे.