पुणे। (पीएनई ) – पीएमपीएमएलमधून पुणेकर मोठ्या संख्येने प्रवास करतात. बस पास हे पीएमपीकरीता आगाऊ मिळणारे उत्पन्न असते. परंतु कोणतीही घोषणा न करता अचानक सर्वच बस पासेस मध्ये वाढ करण्यात आली. यावर कोणचाही अंकुश नाही. पीएमपीच्या पासने प्रवास करणारा प्रवासी हक्काचा असून यामध्ये करण्यात आलेली वाढ जाचक आहे. पीएमपीएलची निकृष्ट सेवा आणि बस पास दरवाढीला विरोध करण्यासाठी पुण्यातील विविध सामाजिक, प्रवासी संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्र येत स्वाक्षरी मोहिम राबविली. ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, कष्टकरी, मोलकरणी, नर्सेस, फेरीवाले व इतर सामान्य नागरिकांनी देखील या स्वाक्षरी मोहिमेत मोठया प्रमाणात सहभाग घेतला.
म्हात्रे पूलाजवळील इंद्रधनुष्य सभागृह येथे पीएमपी प्रवासी मंचाच्यावतीने प्रवासी मेळावा आणि स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला मेजर जनरल सुधीर जटार (निवृत्त), चेतन तुपे, मारुती भापकर, सुजीत पटवर्धन, संजय शंके, कर्नल बाबूराव चौधरी, निश्चय म्हात्रे, मंचाचे अध्यक्ष जुगल राठी, विवेक वेलणकर, संजय शितोळे, सतीश चितळे, यतीश देवडिगा उपस्थित होते. लोकायत पुणे, परिसर पुणे, जनवादी महिला संघटना,शहीद भगतसिंग युवा मंच, पिंपरी-चिंचवड, पिंपरी-चिंचवड सिटीझन्स फोरम,जाणीव संघटना, पुणे, आम आदमी पार्टी, पुणे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुणे, चेतना नागरिक मंच,पीएमपी प्रवासी मंच, सजग नागरिक मंच आदी संघटना मोहिमेत सहभागी झाल्या.
सुजीत पटवर्धन म्हणाले, “सार्वजनिक वाहतूक हा संपूर्ण शहराच्या वाहतुकीचा पाया आहे. ही वाहतूक सुविधा सवलतीची असण्याऐवजी ती मोफत असायला हवी. यामुळे शहरातील नागरीक मोठ्या प्रमाणात सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील. पर्यायाने शहराची प्रदुषण पातळी कमी होईल आणि लोकांचे आरोग्य सुधारेल. आर्थिकदृष्ट्या देखील हे परवडणारे आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने मंजुरी न देता देखील बसपास दरवाढ करण्यात आली. हे अत्यंत बेकायदेशीर आहे. वेळ न दवडता कायदयाचा आधार घ्यायला हवा आणि आता कायदेशीर लढाई लढायला हवी”