पुणे- पुणे विभागातील हॉटेल व्यावसायिकानी त्यांच्या व्यवसायाची वृध्दी करताना अन्न सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले. बालगंधर्व रंगमंदिरामध्ये आज अन्न व औषधे प्रशासनाच्या वतीने अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम 2006 अंतर्गत सुरक्षित अन्नपदार्थ उत्पादन,साठवण,हाताळणी व विक्रीबाबत हॉटेल,रेस्टॉरन्ट,केटरर्स व्यावसायिकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होत, त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी, सचिव किशोर सरपोतदार, पुणे विभागाचे सहआयुक्त शिवाजी देसाई, सं.मा.देशमुख व इतर अधिकारी कर्मचारी आणि मोठया संख्येने हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते
यावेळी पालकमंत्री बापट यांनी त्यांच्या विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये हॉटेल व्यवसाय करणा-यांकरीता अशा प्रकारच्या जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. हॉटेलमध्ये जेवणाकरिता आल्यावर ग्राहकांकडून तात्काळ जेवणाचा दर्जा ठरविला जातो. व त्याचा व्यवसायवृध्दीवर परिणाम होतो. त्यामुळे जेवण तयार करताना पदार्थांची गुणवत्ता राखण्याबरोबरच तेथे स्वच्छतेबाबत जे नियम ठरविले आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी स्वयंशिस्त बाळगावी, त्यामुळे ग्राहकांचेही समाधान होईल. व एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपली जाईल. हॉटेल व्यावसायिकांना येणा-या अडीअडचणींचा निपटारा होण्याकरिता त्यांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तसेच इतर वेळीही या विभागामार्फत सहकार्य होणार असल्याचे सांगितले.