मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) एल्फिन्स्टन स्थानकातील दुर्घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मोर्चाचे नेतृत्त्व करणार असल्याने आज नक्की काय घडणार, याची अनेकांना उत्सुकता आहे. मात्र, हा मोर्चा सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही अजूनही मुंबई पोलिसांकडून मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मनसे आणि प्रशासनात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. आम्ही मोर्चाची संपूर्ण तयारी केली आहे. आता काही झाले तरी मोर्चा निघणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा निर्धार मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी व्यक्त केला आहे. लोकशाहीत मोर्चाला परवानगी दिली जात नाही, हा कुठला नियम म्हणायचा. हा म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका संदीप देशपांडे यांनी केली.
गांभीर्याची आणि शिस्तीची गरज
मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मनसेच्या या मोर्चाला परवानगी दिली जात नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तांत्रिकरित्या तशी परवानगी देणे पोलिसांना आणि प्रशासनाला शक्य नाही. त्यामुळे पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नसली तरी त्यादृष्टीने सुरक्षाव्यवस्था तैनात केली आहे. मेट्रो चित्रपटगृहापासून पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच चर्चगेट स्थानकावर रेल्वे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर मनसेकडूनही या भागात मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी मरिनलाईन्स स्थानकापासून रेल्वे मुख्यालयाकडे येणाऱ्या रस्त्यावर मनसेचे झेंडे आणि बॅनर लावण्यात आले आहेत. तर चर्चगेट स्थानकाच्या परिसरात एक लहानसे व्यासपीठ उभारले जात असून या ठिकाणी राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणात असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चर्चगेट स्थानकाचा परिसर बॅरिकेडस लावून बंदिस्त करण्यात आला आहे.
Check Also
संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब
आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …