मुंबई : भारताला हवा असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम मुंबईत पुन्हा एकदा १९९३ सारखे बॉम्बस्फोट घडवून आणण्याचं कटकारस्थान रचत असल्याचं उघड झालं आहे. दाऊदचा पाकिस्तानात असलेला भाऊ आणि भारतातील त्याच्या हस्तकांमध्ये सांकेतिक भाषेत झालेलं संभाषण मुंबई पोलिसांनी उलगडलं असून त्यातून या कटाची माहिती मिळाली आहे. दाऊदच्या या कटाची माहिती केंद्र सरकारलाही देण्यात आली आहे.
‘टाइम्स नाउ’नं हा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानुसार, मुंबई पोलिसांना दाऊदच्या हस्तकांच्या संभाषणातून इतरही बरीच माहिती मिळाली आहे. दाऊदचे भारतातील काही हस्तक त्याचं बॉम्बस्फोटाचं कारस्थानं तडीस नेण्यासाठी सक्रिय झाल्याचं कळतं. ही माहिती मिळताच पोलिसांनी दाऊदच्या हस्तकांचा शोध सुरू केला आहे. पोलीस व गुप्तचर यंत्रणांपुढं त्यांना शोधून काढण्याचं मोठं आव्हान आहे.
१९९३ साली दाऊदनं मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवले होते. या स्फोटांमध्ये २५७ जण ठार तर ७००हून अधिक लोक जखमी झाले होते. भारतात झालेले हे सर्वात शक्तीशाली बॉम्बस्फोट होते. त्यासाठी आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. त्यावेळीही दाऊदनं भारतातील अनेक लोकांची मदत घेतली होती.