मुंबई – ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा एनडीएमध्ये समावेश झाल्यास तर शिवसेना बाहेर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय, भाजपा नेत्यांमध्येही यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे, अशी चर्चा आहे. काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर एखाद्या पक्षात प्रवेश करणे किंवा स्वत:चा नवा पक्ष काढणे, असे दोन पर्याय होते. त्यातील दुसरा पर्याय मी निवडला आहे, असे सांगत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी रविवारी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नव्या पक्षाची घोषणा केली. यावेळी त्यांनी शिवसेनेवर बोचरी टीकादेखील केली. दरम्यान, नारायण राणेंचा ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ हा भाजपाप्रणित एनडीएमध्ये सहभाग होणार असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय, नारायण राणे यांना राज्य मंत्रिमंडळात महत्त्वाचं खातं मिळणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण राणेंना महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खातं मिळण्याची शक्यता आहे. सध्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही दोन्ही खाती आहेत. नारायण राणे यांना नेमकं कोणते खातं दिली जाणार, यावरुन भाजपा नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. नारायण राणेंना एखादे खाते दिले जात असताना आपल्याकडील महत्त्वाचे खाते काढून घेतले जाऊ नये, यासाठी भाजपा मंत्र्यांची धडपड सुरू असल्याचे बोलले जात आहे.
शिवसेना हेच मुख्य लक्ष्य – नारायण राणे
नारायण राणे यांनी रविवारी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या नव्या पक्षाची घोषणा केली. शिवसेनेवर बोचरी टीका करत उद्धव ठाकरे हेच मुख्य लक्ष्य असतील, असेही राणेंनी स्पष्ट केले. ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ या माझ्या पक्षाची राज्यघटनेशी अविचल बांधिलकी असेल. लवकरच पक्षाची नोंदणी करून झेंडा आणि निशाणी जाहीर करू. ‘सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठीच आम्ही राजकारण करू आणि दिला शब्द पाळू’ हेच आमचे ब्रीदवाक्य असेल, असेही राणे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत राणेंनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणजे ‘कुजके-नासके विचार’ होते, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव आणि शिवसेनाच आपले राजकीय विरोधक असतील, असे राणे म्हणाले. जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करता, मग सत्तेत गेलातच कशाला? काश्मीर आणि बिहारमध्ये भाजपा सत्तेसाठी लाचार झाल्याचा आरोप करणा-या उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात लाचारी का पत्करली, असे सवालही राणे यांनी केले.