- व्यवस्थापकीय संचालक अनंत पद्मनाभन यांची माहिती
पिंपरी- अल्फा लावल कंपनीला जागतिक कंपनी समुहांतर्गत 2015-16 मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळाला आहे. प्रत्येक वर्षी अल्फा लावल समुह आपल्या विविध उत्पादन केंद्रांच्या कामगिरीचे मूल्यमापन करते. त्यानुसार सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या उत्पादन केंद्राला हा पुरस्कार दिला जातो. उत्पादन प्रक्रियेदरम्यान होणात्या अपघातांमध्ये “एलटीआय’चे (लॉस टाईम इंज्युअरी) प्रमाण शून्यावर आणणे आणि किरकोळ अपघातांचे प्रमाण कमी करणे या दोन उद्दीष्टांच्या पूर्ततेसाठी आम्ही भविष्यात काम करणार आहोत, अशी माहिती अल्फा लावल इंडिया कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनंत पद्मनाभन यांनी दिली. अल्फा लावल इंडिया कंपनीच्या यशस्वी वाटचालीबाबत माहिती देण्यासाठी कंपनीच्या वतीने मंगळवारी (दि.12) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पद्मनाभन बोलत होते. कंपनीच्या कार्पोरेट कम्युनिकेशन विभागाच्या विभागीय व्यवस्थापक रजिता कुमार, माईंड मॅटर्सचे विनित माहे यावेळी उपस्थित होते. पद्मनाभन म्हणाले की, अल्फा लावलच्या उत्पादनापैकी सुमारे 50 टक्के उत्पादन पिंपरी-चिंचवडमध्ये होते. तसेच, सातारा आणि शिरवळ या ठिकाणीही उपत्पादन केले जाते. अल्फा लावल भारतात 1937 पासून कार्यरत आहे. सेंट्रीफ्युगल सेप्रेटर्स, डिकॅन्टर्स आणि फ्लो इक्विपमेंट्स तयार करणारी भारतातील आघाडीची कंपनी आहे. अन्न व ऊ र्जा क्षेत्रातील उद्योगांसाठी कंपनीचे भारतातील केंद्र विविध उत्पादने बनविते आणि त्याची निर्यातही करीत आहे.
——–
कंत्राटी कामगारांच्या मागण्या निराधार…
कंत्राटी कामगारांच्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना अनंत पद्मनाभन म्हणाले की, कंपनी व्यवस्थापनाने कुशल कामगार निर्मितीसाठी कायम पुढाकार घेतला आहे. मात्र, कंपनीच्या आवश्यकतेनुसार कंत्राटी कामगारांची नेमणूक केली जाते. संबंधित ठेकेदाराच्या माध्यमातून कंत्राटी कामगार काम करीत असतात. त्यामुळे कंपनीचा संवाद त्या-त्या ठेकेदाराशी होत असतो. अल्फा लावलमध्ये कायमस्वरुपी काम करणारे कामगार व्यवस्थापनावर समाधानी आहेत. याउलट, कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नोकरी हवी आहे. पण, कायमस्वरुपी कामगार घ्यायचे असते, तर कंत्राटी कामगारांची नेमणूक का केली असती? कंपनीने आपली नितीमूल्ये कधीच सोडलेली नाहीत. कंत्राटी कामगारांनी केलेल्या मागण्या निराधार आहेत, असेही पद्मनाभन यांनी म्हटले आहे.