मुंबई: वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, थेरगाव, पिंपळेगुरव या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातून प्रस्तावित रिंगरोड जाणार आहे. यामुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यामुळे हा प्रस्तावित रिंगरोड दाट वस्तीतून न देता पर्यायी मार्गाने वळविण्याची मागणी घर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी नगरविकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली.
घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.18) मुंबईत नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची भेट घेऊन रिंगरोड बाधितांना न्याय देण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात संघर्ष समितीचे विजय पाटील, रेखा भोळे, रजनी पाटील, नारायण चिघळीकर आदी सहभागी झाले होते.
पिंपरी महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार 30 मीटर रुंद एचसीएमटीआरचा 65 टक्के जागेचा ताबा असून उर्वरीत जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते रहाटणी पर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामवर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर होणार आहेत. या कारवाईला विरोध करत रिंगरोड बाधित नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत.
घर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी मुंबईत नगरविकास राज्यमंत्री पाटील यांची भेट घेऊन रिंगरोड पर्यायी मार्गाने वळविण्याचे एक निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रस्तावित रिंगरोड पिंपरी पालिका व प्राधिकरणाच्या हद्दीतून जात आहे. वाल्हेकरवाडी, रावेत, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपळेगुरव, रहाटणी, कासारवाडी या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातून हा रिंगरोड जाणार आहे. यामुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यामुळे हा प्रस्तावित रिंगरोड दाट लोकवस्तीतून न नेता, पर्यायी मार्गाने वळवावा आणि बाधित नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने केली आहे.