मुंबई/ठाणे : मुसळधार पावसाचा हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज खरा ठरताना दिसत असून मुंबई, ठाण्यासह रायगड व विदर्भाला आज पावसानं झोडपून काढलं आहे. मुंबई, ठाण्यातील पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीला फटका बसला आहे. तर, विदर्भात बरसणाऱ्या पावसानं तिथलं दैनंदिन जीवन विस्कळीत करून टाकलं आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगरात आज सकाळपासून पावसानं जोरदार बॅटिंग केली. भांडुप व कांजूर या भागात रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. त्यामुळं लोकल वाहतूक विस्कळीत झाली. मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील वाहतूक उशिरानं सुरू आहे. ठाणे जिल्ह्यासह रायगड, पालघरमध्ये पावसानं बऱ्याच दिवसानंतर दमदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यातील उरण व चिरनेर येथे गेल्या चार तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. चिरनेर गावातील रस्त्या व गल्ल्यांमध्ये कंबरेएवढं पाणी तुंबलं आहे.
२४ तासांत १४१.९ मिमीची नोंद
मुंबई, ठाण्यात मुसळधार; रायगडलाही झोडपले!
नागपूरसह विदर्भातल्या बहुतेक जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. नागपुरात गेल्या २४ तासांत १४१.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. अमरावती, वर्धा, भंडारा, यवतमाळ, गोंदिया, अकोलामध्ये पावसानं चांगली हजेरी लावलीय. नागपूर शहरात काही ठिकाणी पाणी तुंबल्यानं वाहतूक वळविण्यात आली आहे.