मुंबई : केंद्र सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर महिनाभरात राज्य मंत्रिमंडळाचाही विस्तार करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा विस्तार ठरणार असून लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत. त्यासाठी मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लावायची, यासाठी पक्षश्रेष्ठींकडून चाचपणी सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुका २०१९ च्या सुरुवातीला होणार असल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात महिनाभरात विस्तार होणार आहे. महाराष्ट्रातही त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचे ठरले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मध्यंतरी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आढावा घेतला होता. वर्चस्व नसलेल्या भागांवर लक्ष केंद्रीत करण्याचे डावपेच भाजपने आखले आहेत.
आयारामांना संधी?
नारायण राणे यांच्यासह काही आमदारांना पक्षात प्रवेश देण्याबाबतही पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. याबरोबर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांसाठी भाजपने गळ टाकला आहे. या नेत्यांनी पक्षप्रवेश केल्यास त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे. इतर पक्षातून भाजपमध्ये येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांबाबत निर्णय झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून हा विस्तार होईल. मंत्रिमंडळाचा विस्तार करतानाच महामंडळावरच्या नियुक्त्याही करण्यात येणार आहेत.