पुणे : “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि बुद्धिमत्ता ठासून भरलेली आहे. त्यांच्यातील या बुद्धिमतेला चालना दिली, तर मोठ्या प्रमाणात नवनिर्मिती होऊ शकते. त्यामुळे शिक्षणसंस्थांनी स्वस्त आणि दर्जेदार इनोव्हेशनसाठी पुढाकार घेतला पाहिजे. केजे शिक्षणसंस्थेने संशोधन आणि नवनिर्मितीला चालना देत सकारात्मक पाऊल टाकले आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले.
केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजनिअरिंगमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स अँड इनोवेशन लॅब’चे उद्घाटन डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण व देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात संशोधन आणि नवनिर्मितीची आवश्यकता’ या विषयावरील बीजभाषणात डॉ. माशेलकर बोलत होते. याप्रसंगी केेजे शिक्षणसंस्थेचे संस्थापक कल्याण जाधव, खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालक हर्षदा जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, ट्रिनिटी अकॅडमीचे प्राचार्य डॉ. विजय वढाई, पुणे विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे शिवाजी पाचर्णे आदी मान्यवर उपस्थित होते.
कल्याण जाधव म्हणाले, “होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी संस्थेतर्फे शिष्यवृत्तीसह इतर अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यांच्यामध्ये सर्जनशीलता विकसित व्हावी, या हेतूने संशोधनाला चालना दिली जात आहे. बिझनेस इन्क्युबेटरद्वारे व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जात असून, कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर आमचा भर आहे.”
डॉ. हेमंत अभ्यंकर म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी संस्थेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थी शोधून त्यांना घडविण्याचा प्रयत्न आहे. कल्याण जाधव नेहमी मोठ्या स्वरूपातील विचार करतात. 110 एकरावरील या परिसरात वेगवेगळ्या प्रयोगशाळा, प्रकल्प उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
“समाजाला उपयुक्त असे अनेक प्रकल्प विद्यार्थ्यांनी येथे तयार केले आहेत. त्या प्रकल्पांना उद्योगात रूपांतरित करण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने प्रत्येक विभागात गुणवत्ता केंद्र उभारले आहे, असे डॉ. विजय वढाई यांनी प्रास्ताविकात सांगितले. दीप्ती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. विनोद जाधव यांनी आभार मानले.